मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील पायधूनी परिसरातील ही घटना घडली आहे. मृतांमध्ये १३ आणि १६ वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे.
मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फूड पॉइझनिंगमुळे एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाने त्यांच्या इतर नातेवाईकांसह रात्री साडेदहा वाजता जेवण केलं होतं. दुसर्याच दिवशी त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. फॅमिली डॉक्टरकडे गेला असता त्याने जे जे रुग्णालयात सल्ला दिला.
पहिले बिर्याणी खाल्ली, मग कलिंगड खाल्ल्याची माहिती
मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. या प्रकरणात पोलिसांच्या मते, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टेम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या मुली आयशा (१६) व झैनब (१३) अशी झाली आहे.
नेमकं काय घडलं?
पायधुनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणार्या डोकाडिया कुटुंबीयांनी शनिवारी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर रविवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. चौघांनाही तात्काळ जे जे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर काही तासांनी दुसर्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसर्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.